हरतालिका पूजन महत्व,कथा ,आरती व दुर्मीळ योग ची माहिती,2021
हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते.
महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हरतालिका उपवास निर्जळ करतात. यावेळी हरतालिका उपवासाच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग तयार होत आहे. हा उपवास दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीय तिथीला केला जातो. या हरतालिका व्रतचा सुमारे 14 वर्षांनंतर रवि योगाचा दुर्मिळ योगायोग आहे.
ज्योतिषशास्त्रात रवि योग खूप प्रभावी मानला जातो. असे म्हटले जाते की रवि योगाने अनेक अशुभ योग निष्प्रभावी होतात.
असं म्हणतात की ,अविवाहित मुलींनी रवि योगात शिव-पार्वतीची पूजा केली तर त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. आणि विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखाने जगू लागते.
हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो मैत्रीण. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.
पूजा विधी:
स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी.
नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत.
नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे किंवा बेलाचे पण चालते . दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.
हरतालिका कथा:
हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, “हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. “तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`
पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने “तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.
तिचा दृढनिश्चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला “पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.
इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. अशी ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुफळ संपूर्ण...
ओम नमो शिवाय
हर हर महादेव
गजेंद्र मोक्ष स्तोत्रं, पितृपक्षात करायची सेवा
हरितालिका ची आरती:
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ।
आरती ओवाळीत ज्ञानदीपकळिके ।।ध्रु *।।
हरअर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ।
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ।। 1 ।। *जय देवी *।।
रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपक्ष्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठी ।। 2 ।। *जय देवी *।।
तपपंचाग्निसाधने ।
धूम्रपानें अधोवदनें केली बहू उशोषणे ।
शंभू भ्रताराकारणे ।। 3 ।।* जय देवी * ।।
लीला दाखविसी द्रुष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ।। 4 ।।*जय देवी * ।।
काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ।
मातें दाखवी चरण ।
चूकवावे जन्ममरण ।। 5 ।।*जय देवी *।।
टिप्पण्या